नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या निर्देशांनुसार देशातील सातही विमानतळांवर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रक्रियेचं काटेकोरपणे पालन व्हावं, यासाठी आपण या सर्व विमानतळांच्या संपर्कात आहोत, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.
याशिवाय सर्व विमानतळांवर या विषाणूसंबंधीची माहिती देणाऱ्या उद्घोषणा सुरू आहेत. हा विषाणू एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीत संक्रमित होत असल्याने त्याचा धोका अधिक वाढला आहे. या विषाणुमुळे चीनमध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 440 जणांना याची लागण झाली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील याविषयावर चर्चा करण्यासाठी तात्काळ बैठक बोलावली आहे. कोरोना विषाणूमुळे पसरणाऱ्या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करावी का, यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.अमेरिकेतही या विषाणुची लागण झालेला एक रुग्ण आढळला आहे. ही व्यक्ती चीनमधल्या वुहान प्रांतातून अमेरिकेत आल्याचं तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
कोरोना विषाणूची सर्वप्रथम माहिती मिळाली ती डिसेंबर महिन्यात. मात्र, आता हा विषाणू चीनची सीमा ओलांडून इतर देशातही पोचला आहे.
अमेरिकेपूर्वी जपानमध्ये एक तर थायलंडमध्ये दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते.
● कोरोना विषाणू आहे काय?
रुग्णांमधून घेतलेल्या या विषाणूच्या सॅम्पलची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली. त्यानंतर चीनचे अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने हा कोरोना वायरस असल्याचं सांगितलं.
कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर संक्रमित होणाऱ्या कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे.
या नव्या कोरोना विषाणूच्या जेनेटिक कोडचं विश्लेषण करण्यात आलं. कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळलं आहे.
सार्स प्रकारातला कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जातो. 2002 साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.
● कोरोनाची लक्षणे
- डोकेदुखी
- नाक गळणे
- खोकला
- घसा खवखवणे
- ताप
- अस्वस्थ वाटणे
- शिंका येणे, धाप लागणे
- थकवा जाणवणे
- निमोनिया, फुफ्फुसात सूज
हा विषाणू अजूनही नियंत्रणात आणता येईल, असं यापूर्वी चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटलं होतं.
● कोरोना विषाणू किती गंभीर आहे?
कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये साधारणपणे सर्दी-खोकला अशी लक्षणं दिसतात. मात्र, लागण गंभीर असेल तर मृत्यूही ओढावू शकतो.
युनिवर्सिटी ऑफ एडिनबर्गमध्ये प्राध्यापक असलेले मार्क वूलहाऊस म्हणतात, "हा नवीन कोरोना विषाणू आम्हाला आढळला तेव्हा आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की त्याचा परिणाम इतका घातक का आहे. सर्दीची सामान्य लक्षणं यात दिसत नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे."
● कोरोना विषाणू आला कुठून?
हा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही.
नॉटिंगम युनिवर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते, "हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे."
सार्स हा विषाणू मांजरातून माणसांत आला होता. मात्र, या विषाणूचा मूळ स्रोत कोणता आहे, याची अधिकृत माहिती चीनने अजून दिलेली नाही.
● चीनच का?
प्रा. वूलहाऊस यांच्या मते लोकसंख्येचं प्रमाण आणि त्याची घनता यामुळे चीममधले लोक लगेच प्राण्यांच्या संपर्कात येतात.
ते म्हणतात, "येणाऱ्या काळात चीनमध्येच पुन्हा असं काही ऐकायला मिळालं, तर त्यात आश्चर्य वाटणार नाही."
● कोरोना विषाणूचा फैलाव सहज होतो का?
या विषाणुची लागण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला झाल्याची अनेक उदाहरणं समोर आल्याचं चीनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
कोरोना विषाणुग्रस्त रुग्णांची देखभाल करणाऱ्या अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांमध्येही या विषाणुची लक्षणं दिसली आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
या विषाणुविषयी चिंता वाटण्याचं सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे या विषाणुमुळे सर्वांत आधी फुफ्फुसांवर परिणाम होतो. या विषाणुची लागण होताच व्यक्तीला खोकला सुरू होतो.
मात्र, सध्या जी आकडेवारी मिळते आहे तीच अंतिम असेल, असं आताच म्हणता येणार नाही.
● विषाणूचा फैलाव वेगाने होत आहे का?
या विषाणूचा परिणाम मर्यादित असेल, असं सुरुवातीला वाटलं होतं. मात्र, डिसेंबर नंतर अनेक प्रकरणं पुढे आली.
या संसर्गाची सुरुवात चीनमधल्या वुहान शहरातून झाली. मात्र, आता या विषाणुचा फैलाव चीनमध्यल्या इतर शहरात आणि चीनबाहेरही झालेला आहे.
थायलंड, जपान, अमेरिका आणि दक्षिण कोरियातही कोरोनाची लागण झाल्याची काही प्रकरणं समोर आली आहेत. वुहान शहरातून आलेले लोक कोरोनाग्रस्त असण्याची शक्यता जास्त आहे.
कोरोनाची लागण झालेल्या सर्वच लोकांची ओळख पटली आहे, असं गरजेचं नाही असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
नवीन वर्षांत चीन फिरायला गेलेल्या अनेक पर्यटकांच्या माध्यमातून या विषाणूचा फैलाव चीनबाहेरील अनेक देशांमधल्या लाखो लोकांमध्ये झाला असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.
● उपाययोजना
कोरोना विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांवर स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत, जेणेकरून इतरांना याचा संसर्ग होऊ नये. प्रवाशांना ताप आहे का, हे तपासण्यासाठी प्रवासी ये-जा करतात अशा सर्व ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय स्वच्छता राखता यावी आणि संसर्ग टाळवा, यासाठी सी-फूड मार्केट काही काळ बंद करण्यात आले आहेत.
या सर्व उपाययोजना केवळ चीनमध्ये करण्यात आल्या आहेत, असं नाही. चीनव्यतिरिक्त आशियातील इतर अनेक देश आणि अमेरिकेतही असेच खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत.
● तज्ज्ञ काय सांगतात?
डॉ. गोल्डिंग म्हणतात, "सध्या आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार परिस्थिती किती चिंताजनक आहे, हे सांगणं कठीण आहे."
"कोरोना विषाणूच्या स्रोताची माहिती मिळत नाही तोवर अडणची कायम राहणार आहेत."
माणसाला संसर्ग करणाऱ्या आणि विशेषतः पहिल्यांदाच संसर्ग करणाऱ्या प्रत्येक विषाणुविषयी चिंता करायला हवी, असं प्रा. बॉल यांचं म्हणणं आहे.
कारण जेव्हा पहिल्यांदाच एखाद्या विषाणुचा फैलाव होतो तेव्हा तो कसा रोखायचा, त्यावर कोणते उपचार आहेत, हे सगळं जाणून घेण्यात बराच वेळ जात असतो.
प्राण्यांमुळे माणसं कशी आजारी होऊ शकतात?
गेल्या 50 वर्षांमध्ये अनेक संसर्गजन्य आजार प्राण्यांकडून माणसांकडे येऊन वेगाने पसरले.
1980च्या दशकामध्ये HIV/AIDS ची सुरुवात ग्रेट एप्स (Great Apes) म्हणजेच माकडांपासून झाली. 2004-07 या काळात बर्ड फ्लूची साथ पक्षांकडून पसरली. तर 2009मध्ये डुक्करांमुळे स्वाईन फ्लू पसरला. सिव्हियर अक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम (SARS) हा सिव्हेट्स (Civets) मुळे पसरल्याचं नुकतंच आढळलं होतं. तर EBOLA (इबोला)ची लागण माणसांना वटवाघुळांकडून झाली.
मानवाला प्राण्यांपासून कायम आजार झाले आहेत. खरंतर बहुतेक संसर्गजन्य आजार हे वन्य प्राण्यांकडूनच आले आहेत.
पण आता बदलत्या वातावरणामुळे या प्रक्रियेला वेग आलाय. शहरांमध्ये वाढलेली गर्दी आणि आंतरराष्ट्रीय प्रवासांचं वाढलेलं प्रमाण यामुळे आता हे आजार लवकर पसरतात.
आजार प्रजाती बदलून कसे पसरतात?
आजार वाहून नेऊ शकतील असे विविध रोगकारक बॅक्टेरिया आणि विषाणू (Pathogens) बहुतेक प्राण्यांमध्ये असतात.
नवीन शरीरांमध्ये संसर्ग करणं हाच या रोगकारक विषाणूंकडचा टिकून राहण्याचा पर्याय असतो. म्हणूनच एका प्रजाती मार्फत दुसऱ्या प्रजातीत शिरकाव करणं हा त्यासाठीचा एक मार्ग असतो.
नवीन प्रजातीच्या शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा हे रोगकारक बॅक्टेरिया आणि विषाणू मारून टाकण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच या दोन्हींमध्ये एकमेकांवर मात करण्याची स्पर्धा सुरू होते.
उदाहरणार्थ, 2003 मध्ये सार्सची साथ आली तेव्हा याची बाधा झालेल्यांपैकी साधारण 10% लोकांचा मृत्यू झाला. पण फ्लूच्या साथीमध्ये 0.1% पेक्षा कमी लोकांचा मृत्यू झाला होता.
हवामान आणि वातावरणामध्ये होणाऱ्या बदलांमुळे प्राण्यांचा अधिवासही बदलतोय. प्राणी कुठे राहतात, कसे राहतात आणि कोणता प्राणी कोणाला खातो यामध्येही बदल होतोय.
माणसाच्या राहणीतही फरक पडलेला आहे. जागतिक लोकसंख्येपैकी 55% लोकसंख्या आता शहरांमध्ये राहते. 50 वर्षांपूर्वी हे प्रमाण 35% होतं.
आणि या मोठ्या शहरांमध्ये उंदीर, घुशी, रॅकून (Raccoons), खार, कोल्हा, लांडगा, माकडं अशा प्राण्यांना नवीन घर मिळतं. बागा, उद्यानं, माणसांनी केलेला कचरा यामध्ये हे सगळे प्राणी राहू शकतात.
अनेकदा जंगलांपेक्षा या प्राण्यांना शहरांमध्ये जगणं सोपं जातं. कारण इथे त्यांना भरपूर अन्न मिळतं. परिणामी या शहरी भागांमधल्या रोगराईतही वाढ होते.
धोका कोणाला?
नवीन प्रजातीतला नवीन रोग हा अनेकदा जास्त धोकादायक असतो. म्हणून एखादा नवीन रोग आढळल्यावर चिंता व्यक्त केली जाते.
त्यातही काही गटांना हे रोग होण्याचा धोका इतरांपेक्षा जास्त असतो.
शहरात राहणारी गरीब लोकं ही बहुतेकदा स्वच्छता आणि साफसफाईच्या कामात सहभागी नसतात. त्यामुळे त्यांचा या रोगांच्या स्रोतांशी संबंध येऊन त्यांना संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो.
शिवाय पुरेसा आहार न मिळणं, स्वच्छ-निरोगी वातावरण न मिळाल्याने त्यांची रोगप्रतिकारक शक्तीही कमी असण्याची शक्यता असते. असे लोक आजारी पडल्यास त्यांना औषधोपचार परवडणारे नसतात.
शिवाय शहरांमध्ये लहान जागेत जास्त व्यक्तींचा वावर असतो. हे सगळेच जण लहानशा जागेत श्वास घेतात, त्यांचा स्पर्शही अनेक गोष्टींना होतो. त्यामुळे शहरांमध्ये नवीन संसर्ग जास्त वेगाने पसरतात.
काही संस्कृतींमध्ये शहरी प्राणी म्हणजे शहरातच पकडलेले वा परिसरातच जोपासण्यात आलेल्या प्राण्यांचं अन्न म्हणून सेवन केलं जातं.
रोगांमुळे आपली वागणूक कशी बदलते?
कोरोना व्हायरसच्या आतापर्यंत 8000 केसेस आढळल्या आहेत. तर यामुळे 170 जणांचा मृत्यू झालाय. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न विविध देश करत असले तरी याचे आर्थिक परिणाम होणार हे नक्की.
प्रवासावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. आणि आपल्यालाही याची बाधा होऊ शकते या भीतीने लोक एकमेकांशीही वेगळं वागत आहेत.
परिणामी सरहद्द ओलांडून जाणं कठीण होतं. जागोजागी जाऊन हंगामी काम करणाऱ्यांना स्थलांतर करता येत नाही आणि याचा परिणाम उत्पादनावरही होतो.
आपण काय करू शकतो?
प्रत्येक नवीन संसर्गजन्य आजार ही एक स्वतंत्र समस्या असल्याचं समाज आणि सरकारकडून पाहिलं जातं. त्याच्याकडे जग बदलणारी एक गोष्ट म्हणून पाहिलं जात नाही.
आपण पर्यावरणात जितके बदल करू तितका इको-सिस्टीमला धक्का लागेल आणि अशा प्रकारच्या आजारांच्या उद्रेकाला संधी मिळेल.
आतापर्यंत जगातल्या एकूण रोगकारक बॅक्टेरिया आणि विषाणूंपैकी फक्त 10% ची ओळख पटलेली आहे. अजूनही इतर रोगकारकांची ओळख पटलेली नाही आणि प्राण्यांमध्ये हे विषाणू असू शकतात.
शहरात राहणाऱ्या अनेकांना शहरी प्राणी महत्त्वाचे वाटतात. पण यातल्या काही प्राण्यांमुळे धोके संभवतात, हे देखील आपण लक्षात घ्यायला हवं.
शहरात नव्याने आढळणाऱ्या प्राण्यांची नोंद ठेवणं, त्यांच्यावर नजर ठेवणं गरजेचं आहे. शिवाय लोक जंगली प्राणी मारून खात आहेत का, ते परिसरातल्या बाजारांमध्ये आणत आहेत का, यावरही लक्ष ठेवायला हवं.
स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, पेस्ट कंट्रोल या सगळ्याद्वारे विषाणूंचा उद्रेक आणि फैलाव रोखता येण्याजोगा असतो.
शिवाय ज्या प्रकारे आपण पर्यावरण हाताळतो वा त्याच्याशी संबंध ठेवतो, त्याकडेही पाहणं महत्त्वाचं आहे.
लेख -bbc marathi- https://www.bbc.com/marathi/international-51325599?helo_ver=2.9.2.01&helo_api_ver=792&helo_language=hi&helo_region=hi&device_id=6607698319236122117&helo_aid=1342&channel=oppostore_int&device_type=CPH1725&os=android&version_code=292&long_version_code=29201&is_install_whatsapp=1&os_version=7.1.1
0 टिप्पण्या